शतकमहोत्सव सदर क्र. ८ : २५ वर्षातील चालक मंडळातील सदस्य
कुठल्याही संस्थेच्या दृष्टीने पहिली २५ वर्षे अतिशय महत्वाची असतात. या काळात संस्थेचा पाया घातला जातो. तो जेवढा मजबूत तेवढी संस्थेची इमारत स्थिर आणि चिरकाल टिकणारी असते.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन खरोखरच भाग्यवान कि संस्थेचे हीत पाहणारी नि:स्वार्थी, कर्तव्यदक्ष व धडाडीची अशी माणसे त्या पंचवीस वर्षाच्या काळात संचालक मंडळावर होती. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
त्रिंबक मोरेश्वर पारधी (दादासाहेब):
आदरणीय दादासाहेब पारधी हे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या आद्य संस्थापकांपैकी एक प्रमुख संस्थपाक होते. विद्यालयाच्या मूळ कल्पनेपासून, स्थापनेपासून, इमारत बांधण्यापासून, व विद्यालय या संस्थेस मूर्त स्वरूप देईतो पर्यंत दादासाहेब यांनी अविश्रांत श्रम घेतले.
विद्यालयाचे ध्येय ठरवण्यात दादासाहेबांचा शब्द फार महत्वाचा होता. विद्यालयाचे ध्येय ” To impart sound and rational education in arts, industries and physical culture ” असे असावे हे दादासाहेब यांचेच म्हणणे स्वीकारले गेले. कै. लोकमान्यांचे स्मृत्यर्थ वरील ध्येयानुसार सुरु केलेल्या विद्यालयातून अर्थातच स्वावलंबी, बुद्धीमान, सुदृढ तरुण बाहेर पडावेत व ते स्वत:च्या पायावर उभे रहावेत अशी दादासाहेबांची इच्छा होती. शाळा सुरु झाल्यावर विद्यालयास जागेची व मालकीच्या इमारतीची अडचण भासु लागताच श्री. पारधी यांनी जसजशी पैशाची गरज लागली तसतशी मदत देऊन पस्तीस हजार रुपये खर्च केले . तसेच श्री.वि.वा.परांजपे यांचेकडून ए स्कीम मधील विकत घेतलेल्या एका प्लॉटवर विलेपार्ले नगरीच्या शिक्षणाबाबतच्या सर्व गरजा भागविता येतील अशी त्या काळी प्रशस्त वाटणारी इमारत १९२३ मध्ये बांधून पुरी केली व त्या विद्यालयास स्वगृही आणले.
श्री. दादासाहेब पारधी यांची कार्यपद्धति अशी होती कि कार्य हाती घेतले की ते मानासाठी नव्हे तर कर्तव्यबुद्धीने करावयाचे व त्या कार्याशी समरस व्हायचे. निरलसता, दीर्घ कष्ट करण्याची सवय, मनाची खंबीरता , शिस्तप्रियता , हे दादासाहेबांचे गुण खरोखरच अनुकरणीय आहेत. “कर्तव्यबुद्धीने केलेले कार्य मनुष्यास अमरत्व देते” या सिद्धांतावर दादांचा दृढ विश्वास होता. विद्यालयाखेरीज पार्ल्यातील सार्वजनिक हितसंबंधांची प्रत्येक बाब घेतली तरी तीत असे दिसेल की दादासाहेबांनी त्या बाबतीतला मोठ्यात मोठा भाग ‘ तनंमन धनाने’ उचललेला होता. पार्ल्यातील सर्व कार्यकर्त्यास ही जाणीव होती व त्यामुळेच पुष्कळसे होतकरू कार्यकर्ते श्री. दादासाहेब यांचेकडे आदरयुक्त भावनेने पाहात. विलेपार्ल्याच्या नागरिक जीवनात क्रांती घडविणाऱ्या कार्यकर्त्याचे श्रेणीत दादासाहेबांना अग्रस्थान द्यावे लागेल यात शंका नाही. अशा थोर पुरुषाचा आशीर्वाद टिळक विद्यालयास आरंभापासून आहे. विद्यालयाची कायम घटना मुकर करण्याचे वेळी श्री.दादासाहेबांची स्पष्टोक्ति व करारी वृत्ती अनुभवास आली.
विद्यालयास दिलेल्या देणगीचे दादासाहेब यांनी ट्रस्टडीड मधील विद्यालयावर घातलेली बंधने राहणार नाहीत असे त्यात स्पष्ट केले आहे. ट्रस्ट डीड करुन देताना दादासाहेबांनी मनाचा जो दिलदारपणा दाखविला तो त्यांच्या थोर मनाची जणू कांही साक्षच देत आहे. विद्यालयाने ट्रस्टडीडची अट पूर्ण केली.
विष्णु बाळकृष्ण परांजपे (तात्यासाहेब) :
पार्ल्यातील जुने व दानशूर नागरिक अशी यांची ख्याती आहे. श्री. दादासाहेब पारधी यांचे खांद्यास खांदा लावून विद्यालयाचे कामी स्वार्थत्याग पूर्वक काम करण्यात तात्यासाहेब नेहमीच अग्रभागी होते.सुमारे सव्वाचार हजार वारांचे विस्तीर्ण क्रीडांगण विद्यालयास देणगीरूपाने देऊन तात्यासाहेब यांनी विद्यार्थ्यांच्या खेळण्याची कायम स्वरूपी सोय करून ठेवली.आरंभापासून विद्यालयाचे खर्चात येणारी तूट भरून काढण्यात तात्यासाहेब यांनी पुष्कळ वर्षे द्रव्यदानाने विद्यालयास उपकृत केले. दरसाल बक्षीस समारंभाप्रित्यर्थ ३५ रु. रोख देणगी देण्याचा नवीन उपक्रम त्यांनी सुरु केला.तात्यासाहेब हे आरंभापासून विद्यालयाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद व विद्यालयाच्या आद्य संस्थापकांपैकी एक असून अध्यक्ष व उपाध्यक्षपदांवरही त्यांनी कामे केली;
श्री तात्यासाहेब हे जुन्या चालीचे खानदानी गृहस्थ असून ‘ साधी रहाणी व उच्च विचारसरणी’ हा त्यांचा स्वभाव विशेष आहे. ‘पार्ले टिळक विद्यालय ‘व ‘पार्लेश्वर मंदिर’ ही दोन तात्यासाहेबांची पार्ल्यातील जागती स्मारके त्यांनी आपल्या हयातीतच निर्माण केली. विद्यालयाच्या विशिष्ट कार्यक्रमप्रसंगी तात्यासाहेब उपस्थित राहत असत.
भास्कर गणेश भिडे :
हे पार्ले येथील भिडे कंपनीचे मालक व विद्यालयाच्या आद्य संस्थापकांपैकी एक. ते विद्यालयाच्या अग्रेसर चालकांपैकी एक कष्टाळू व स्वार्थत्यागी गृहस्थ होते. इंग्रजी शाळेचे वर्ग सुरुवातीस त्यांचे घरी उणीपुरी दोन वर्ष भरत होते. भास्कररावांची आर्थिक परिस्थिती तेव्हा फारशी समाधानकारक नसतांही सुरुवातीस पाच हजार रुपयांच्या देणगीचे आश्वासन त्यांनी विद्यालयाला दिले.विद्यालयाबाबतचे कोणतेही बाजारहाटीसंबंधीचे कामकाज रा. भास्करराव घरगुती नात्याने विद्यालयावरील प्रेमामुळे फारच आपुलकीने करीत असत.
गोपाळ रामचंद्र फाटक :
विद्यालयाच्या सुरुवातीपासून १९४२ जून अखेरपर्यंत सतत २१ वर्ष गोपाळ राव हे विद्यालयाचे खजिनदार होते. निरलस, नि:स्पृह, हिशेबी व कष्टाळू स्वयंसेवक असे त्यांचे वर्णन केल्यास अतिशयोक्ति होणार नाही. सुवर्णमध्य साधण्याची कला गोपाळराव यांना साध्य झाली होती. ते विद्यालयाचे तहहयात खजिनदार व लोकमान्य सेवा संघाचे तहहयात अध्यक्ष अशा दोन जबाबदार अधिकारांवर होते व दोन्ही संस्थांमध्ये गोपाळरावांचा शब्द मोलाचा मानला जाई. गोपाळरावांनी विद्यालयाचे हिशेब अत्यंत चोख ठेवण्यात दक्षता बाळगली होती.
गणेश हरी पेठे (भाऊसाहेब) :
भाऊसाहेब पेठे हे विद्यालयाच्या १९२३ पासून बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये होते. १९३० ते १९३८ पर्यंत ते बोर्डाचे चिटणीस होते. या काळात त्यांनी विद्यालयाच्या स्थैर्यासाठी जे कष्ट, सायास व उलाढाली केवळ विद्यालयाविषयीच्या हितैष भावनेने केल्या त्या अवर्णनीय होत. श्री. पेठे यांनी विद्यालयाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे यत्न केले. विद्यालयात शिक्षकांकरीता पगाराच्या ग्रेडस् सुरु करुन त्यांनी शिक्षकवर्गात कायमपणा आणला. खाजगीरीत्याही श्री पेठे हे शिक्षकांना मदत देण्यासाठी तयार असत, यामुळे शिक्षकांना त्यांचेबद्दल आदर होता. बरेच लायक शिक्षक मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या सर्व गोष्टी करताना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या कलानेच त्या करवून घ्याव्या लागत. श्री दादासाहेब पारधी यांनी वृद्धत्वामुळे अध्यक्षीय जबाबदारी सोडली तेव्हा श्री. भाऊसाहेब यांना अध्यक्ष निवडण्यात आले.श्री.पारधी इंग्लंडमध्ये असताना काही काळ श्री. भाऊसाहेब हे विद्यालयाचे हंगामी सर्वाधिकारी होते. यावरून भाऊसाहेबांच्या विद्यालयातील कामगिरीची बहुविधता स्पष्ट कळेल.
जगन्नाथ बाबाजी गोसावी :
यांनी विद्यालयास १००१ रु. देणगी दिली होती. हे बोर्डाचे सभासद होते. ते सन १९२५ मध्ये दिवंगत झाले.त्यांच्या पुत्राने व पत्नीनीं कै. वा. गोसावी यांची स्वत: ची खाजगी लायब्ररी होती ती जशीच्या तशी विद्यालयास देणगी म्हणून दिली.
कृष्णाजी महादेव आगाशे :
विलेपार्ल्यातील पहिले दक्षिणी घरंदाज. गृहस्थ असे कै. अण्णासाहेब आगाशे यांचे वर्णनकरता येईल. दक्षिणी वस्ती पार्ल्यास वाढावी अशी त्यांची फार इच्छा असे व म्हणूनचं ते पार्ले टिळक विद्यालयाचे बाबत अगदी आरंभापासूनचे खटपटीत असत. पहिल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे ते सभासद होते. अण्णासाहेब १९२६ मध्ये निवर्तले. ते सढळ हाताने पुष्कळ संस्थांस मदत करीत असत असा त्यांचा लौकिक होता.
त्रिंबक महादेव लिमये (बाबुराव लिमये) :
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद असून विद्यालयाच्या सुरुवातीपासून विद्यालयास आर्थिक मदत करीत असत. हे सन १९४१ मध्ये स्वर्गवासी झाले.
गणेश विष्णू गानू (भाऊसाहेब गानू) :
विद्यालयाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे उणीपुरी १२ वर्षे सभासद होते. सडेतोड स्वभाव, प्रेमळ हद्य, साधी वागणूक हे भाऊसाहेब गानू यांचे स्वभाव विशेष सांगता येतील.हे विद्यालयाचे काही काळ उपाध्यक्ष होते.
कान्होबा मोरोबा पडते :
हे विलेपार्ले येथे बिल्डिंग काँट्रॅक्टर म्हणून प्रसिद्ध होते. श्री. पडते यांनी विद्यालयाचे दक्षिणेकडील वाढविलेल्या इमारतींचे बांधकाम स्वत: करवून घेतले आहे. श्री. पडते यांचा विद्यालयाशी फार जुना ऋणानुबंध होता.
कृष्णाजी बलवंत सामंत:
हे व्यापारी होते. त्यांनी विद्यालयास ५०१ रु ची देणगी दिली होती. ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये निवडून आले. ते एक आस्थेवाईक गृहस्थ होते.
दिनकर गणेश भिडे (भाऊसाहेब):
विद्यालयाच्या बोर्ड ऑफ डाइरेक्टर्सचे अध्यक्ष होते . यांचा उणीपुरी १५ वर्ष विद्यालयाशी बोर्डाचे सभासद या नात्याने संबंध होते. १९३८ ते १९४२ पर्यंत त्यांनी चिटणीस म्हणून काम पाहिले ‘ बारकाईने व चौकस काम करण्याची त्यांची हातोटी होती.
वासुदेव दामोदर जोग (नानासाहेब):
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे चिटणीस होते. यांचा डायरेक्टर या नात्याने विद्यालयाशी ८/९ वर्ष निकटचा संबंध होता .१९३८ चे प्रारंभी ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद झाले.ते विद्यालयाचे काम फार कसोशीने व नि:स्वार्थ बुद्धीने करीत. विद्यालयाची आर्थिक बाब सुधारण्याकरीता त्यांनी फारच मेहनत घेतली.आर्थिक अडचण, पुरेशा शिक्षकांची वाण, जागेची उणीव, विद्यालयाच्या वाढत्या गरजा व महर्गता या सर्वास तोंड देण्यातच त्यांचा बराच वेळ व मेहनतही खर्च होत. निष्ठेने व चोखपणाने काम करणे हे त्यांचे ध्येय. हे स्वत: अकौंटंट असल्याने विद्यालयाचे अंदाजपत्रक आवाक्याबाहेर जाऊ न देता शक्य तो जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याचा ते कसून यत्न करत.
पुरुषोत्तम विश्वनाथ जोशी : (बापूसाहेब) :
विद्यालयाचे खजिनदार होते. मनमिळाऊपणा व विनोदी स्वभाव हे त्यांचे स्वभावविशेष होते. हे पार्ल्यातील जुन्या पिढीपैकी असून विद्यालयास त्यांनी कायम स्वरूपाची देणगी दिली होती.
चिंतामण जयराम पेठे (तात्यासाहेब):
श्री. पेठे हे बोर्डाचे सभासद असून अंतर्व्यवस्थेकडे आस्थेवाईकपणे पाहत विद्यालयाची कीर्ति व दर्जा वाढावा, शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात, चांगले शिक्षक लाभावेत व मुलांचा फायदा व्हावा अशी त्यांना कळकळ होती. विद्यालयाची जागेची अडचण दूर व्हावी व नव्या इमारतीची योजना शक्य तितक्या ताबडतोब मूर्त स्वरूपात आणली जावी अशी त्यांची इच्छा होती. विद्यालयाचा बाह्य डामडौल वाढविण्यापेक्षा शिक्षणाची बाजू चांगली उठावदार व्हावी व छोटेसे कार्य पण ते नमुनेदार व्हावे असा तात्याचे बोलण्याचा नेहमी रोख होता. बोर्डाच्या सिलेक्शन कमिटीचे श्री. तात्यासाहेब एक सभासद होते .
बी. बी. केसकर (भीमराव केसकर) :
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे एक जुने सभासद. श्री.केसकर यांचे मुंबईच्या प्रार्थना समाजातील कार्यही मोठे आहे. पदवीधर नसतानाही त्यांचे लेखन विशाल आहे. सुबोधपत्रिकेचे ते संपादक होते.स्पष्टोक्ति व समतोल न्यायवृत्ती हे त्यांचे स्वभाव विशेष होत. साधी राहाणी व उच्च विचारसरणी, सरळ वागणे व बोलणे या गुणांमुळे त्यांचेबद्दल आदरभाव वाढतो.
रावसाहेब वासुदेव सदाशिव सोहनी (रिटायरर्ड सुप्रिटेंडेंट, राममोहन इंग्लिश स्कूल, मुंबई) :
रावसाहेब हे सामान्य शिक्षकापासून सुप्रिटेडेंटपदापर्यंत चढत गेले असल्यामुळे सामान्य शिक्षकांच्या अडचणींची त्यांना पूर्ण कल्पना होती. शिक्षण संस्थांशी उणीपुरी दोन तपे त्यांचा संबंध आल्यामुळे व ते विद्यालयाचे बोर्डावर असल्यामुळे विद्यालयाच्या मोठमोठ्या अडचणी त्यांना लवकर आकलन करता येत व त्यांच्या मार्मिक सूचनांचा बोर्डास फायदा मिळे. रावसाहेब हे बोर्डाच्या ‘सिलेक्शन कमिटी’चे सभासद होते.
शेषगिरी नारायण कलबाग :
पार्ले म्युनिसिपालिटीचे ते बरीच वर्षे उपाध्यक्ष होते.त्यांच्या सरळ व न्यायी स्वभावामुळे त्यांचे मार्गदर्शन हे उत्तम प्रतीचे होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचेविषयी आदरभाव होता. कर्तव्यबुद्धीने कार्य करणे व बोलण्याचालण्यात शालीनता हे श्री. कलबाग यांचे स्वभावविशेष होत.गुंतागुंतीचे प्रश्न चर्चिल्यानंतर विचार पूर्वक निर्णायक मतप्रदर्शन करताना श्री. कलबाग यांच्यामधील बुद्धीचा प्रकर्ष दिसत असे.
शंकर अनंत लिमये :
हे बोर्डाचे सभासद होते. मार्गे ३/४ वर्षे रा. शंकरराव विद्यालयाचे हिशेब तपाशीत असत. शांत वृत्ति व मनमिळाऊ स्वभाव हे शंकररावांचे स्वभावविशेष होत. खेळीमेळीच्या वातावरणांत विद्यालयाचा गाडा पुढे ढकलला जावा अशा धोरणाने शंकरराव नेहमी वागत असत.
शेठ ब्रिजमोहन लक्ष्मीनारायण रुइया :
हे बोर्डाचे सभासद होते. ते व्यापारी असून विद्यालयास त्यांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली होती. विद्यालयास केव्हाही आर्थिक मदत करण्यास शेटजी उदारपणे मदत करावयास तयार असत.